पुणे : ‘मुलांना समान संधी मिळण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. मला आरक्षण नको, आम्ही आमच्या गुणवत्तेवर इतरांशी स्पर्धा करून जिंकू, असे प्रत्येक विद्यार्थ्यांने म्हणावे. मुलांना चारित्रवान व प्रामाणिक बनविण्यासाठी शिक्षकाने स्वतः प्रामाणिक असायला हवे. पालक व शिक्षक मुलांचे आयकॉन बनावेत. जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगला माणूस होणे गरजेचे असून, त्यासाठी शालेय वयापासूनच चांगले संस्कार मिळावेत,’ असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून दी इंटरनॅशनल असोशिएशन ऑफ लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ यांच्या वतीने व पुणे विद्यार्थी गृह यांच्या सहकार्याने आयोजिलेल्या शिक्षक गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या. विशेष मुलांना वर्षानुवर्षे शिक्षण देऊन सामाजिक कार्यास हातभार लावणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. या वेळी प्रांतपाल लायन रमेश शहा, सुनील वोरा, उपप्रांतपाल ओमप्रकाश पेठे, उपप्रांतपाल अभय शास्त्री, पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, कुलसचिव सुनील रेडेकर व संयोजक प्रकाश नारके, शरद पवार, दिलीप निकम, शाम खंडेलवाल, राजेंद्र गोयल यांच्यासह सर्व विभागीय प्रांतअधिकारी उपस्थित होते.
नीला सत्यनारायण म्हणाल्या, ‘विशेष मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान लायन्स क्लब करत आहे, यासाठी त्यांना मी वंदन करते. विशेष मुलांना सहानुभूती न दाखवता त्यांच्या नकळत त्यांचे जीवन अधिक सोयीस्कर करून देणे, हे आपले काम आहे. शाळा आणि शिक्षकांचा प्रभाव हा मुलांवर पडत असतो. शिक्षक हे मुलांचे श्रद्धास्थान असतात. मुलांवर अनेक गोष्टींचे दडपण येते. अशावेळी शिक्षकांनी मुलांना विश्वासात घेऊन शिकवायला हवे. पालकांनी आपली स्वप्ने त्यांच्यावर लादण्यापेक्षा त्यांना आवडते करिअर करू द्यावे.’
रमेश शहा म्हणाले, ‘शिक्षक समाज घडवत असतो, राष्ट्रउभारणीच्या काम करत असतो; परंतु आज विद्यार्थ्यांकडे माहिती मिळविण्यासाठी इतर स्त्रोत निर्माण झाले आहे. त्यामुळे शिक्षकांकडे ज्ञानाचा खजिना असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांपासून उत्कृष्ट पालक घडविण्याचे काम शिक्षक करत असतो. खरा शिक्षक हा विद्यार्थ्यांना नेहमी प्रेरणा देत असतो.’
नाशिकच्या विद्या फडके यांच्या ४० वर्षांच्या शिक्षकसेवेची दखल घेऊन त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. सन्मानचिन्ह व मानपत्र व रोख ३१ हजार रुपये ‘लायन्स’तर्फे देण्यात आले. फडके यांनी नाशिकला घरकुल संस्थेची स्थापना करून प्रौढ, अपंग तसेच व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचे कार्य करत आहेत. त्यांनी ४५ जणांना आतापर्यंत रोजगार मिळवून दिला आहे. या वेळी एकूण ४० शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
प्रकाश नारके यांनी प्रास्ताविक केले. सारिता सोनावले, गंधाली देसाई यांनी सूत्रसंचालन केले. शाम खंडेलवाल यांनी आभार मानले.